रायगड : कोकणात (Konkan) पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे रायगडमधील (Raigad) खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) गावावर डोंगराचा काही भाग कोसळून अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली.
ढिगाऱ्याखालून 75 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर, आतापर्यंत 12 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी 60 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले आहेत. ते सकाळपासून इर्शाळवाडीच्या पायथ्याशी असून बचावकार्यावर नजर ठेवून आहेत.
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. वसाहतीत आदिवासी ठाकर समाजाची घरे आहेत. खालापूरमधील चौक गावापासून 6 किलोमीटर अंतरावर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासी वाडी आहे.