बंगळुरु : देशभरातील आज तब्बल 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं. या आघाडीला ‘इंडिया’ असं नाव देण्यात आलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत ‘INDIA’चा अर्थ देखील सांगितला. I म्हणजे इंडियन, N म्हणजे नॅशनल, D म्हणजे डेमोक्रेटिक, I म्हणजे इन्कुसिव्ह, A म्हणजे अलायन्स, असे खर्गे म्हणाले. विशेष म्हणजे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका केली.
मल्लिकार्जुन काय म्हणाले?
“भाजपला देशाची लोकशाही आणि संविधान मिटवायचे आहे. विरोधकांना चूप बसविण्यासाठी ते ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा वापर करत आहेत”, आपल्याला देशाला कसं वाचवता येईल यासाठी प्रयत्न करणं हेच आमचं ध्येय आहे. विरोधकांच्या बैठकीची पुढची बैठक ही मुंबईत होईल.” असे खर्गे यांनी सांगितले.
‘INDIA’ आघाडीचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर “विरोधकांच्या समन्वयासाठी 11 संयोजक बनविण्यात येणार आहेत. मुंबईच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार. ‘INDIA’ आघाडीचं नेतृत्व कोण करणार? याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. ही फार काही मोठी गोष्ट नाही.” असेही मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.
“आज 26 पक्ष एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी 30 पक्षांची एनडीए बैठक बोलावली आहे. त्यांच्या एनडीएतून अनेक पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्या एनडीएचे तुकडे झाले आहेत. आता निवडणुकीच्या आधी मोदी ते तुकडे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत” असा टोलाही खर्गे यांनी लगावला.
“आमचं ध्येय हे प्रत्येक महत्त्वाचे विषय एकामागेएक घेण्याचं आहे. आम्ही आपापसातले सर्व मतभेद दूर सारुन लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही आगामी निवडणुकीला एकत्रितपणे सामोरं जाणार आहोत. मी सर्वांचे आभार मानतो”, असं खर्गे म्हणाले.