रत्नागिरी : राज्यात मान्सून (Monsoon) अद्याप दाखल झाला नाही. सर्व दूर पाऊस सुरू झालेला नाही. तरी देखील बिपरजॉय (Beeperjoy) चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणामध्ये फरक पडलेला दिसून येत आहे. राज्यातील समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळल्याच पाहायला मिळत आहे. त्यामुळे गणपतीपुळे (Ganapatipule) येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
राज्याला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यापैकी कोकण आणि मुंबई समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. या भागात सध्या चक्रीवादळामुळे मोठ्या लाटा उसळलेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये पर्यटकांकडे अचानक समुद्राचे पाणी येताना दिसत आहे. हा व्हिडिओ गणपतीपुळे येथे असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये समुद्राच्या पाणी अचानक किनाऱ्यावर येत असल्याने पर्यटकांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून येत आहे.
समुद्राला आले उधाण
गेल्या दोन दिवसापासून गणपतीपुळे येथील समुद्राला उधाण आले आहे. भरती मुळे मोठ्या लाटा गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर धडक देत आहेत. समुद्राचे पाणी थेट मंदिरापर्यंत येऊन घुसले आहे. त्यामुळे पर्यटक आणि किनाऱ्यावरील दुकानदारांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आगामी काळात मुसळधार पावसाचा तसेच वादळाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.