नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले आहेत. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री पदाच्या खुर्चीवर बसला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत, असा विश्वास कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2029 पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या आणि राबवता आल्या. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य मोबदलाही देण्यात आल्याचेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री असल्याने राज्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यामुळे 2024 च्या निवडणुकीतही त्यांनी मुख्यमंत्री राहावे कारण ते मुख्यमंत्री असतानाच जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतील.
केंद्राच्या मदतीने राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, मी कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एक रुपयामध्ये विमा योजना राबवण्यात आली. केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.