इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात यश : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

48

मुंबई : इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री दरड कोसळण्याची घटना घडली. आतापर्यंत 119 जणांची सुटका करण्यात आली आहे. मात्र दुर्दैवाने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, सततचा पाऊस आणि चिखल, धुके यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. या बचत कार्यात राज्य सरकारच्या यंत्रणेसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. गुरुवारी दिवसभरात एकूण 119 लोकांना वाचवण्यात यश आलं. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहेत. या घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत दिली जात आहे.

आजही या ठिकाणी बचावकार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनेच्या दोन तासांत आमची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली, गिरीश महाजन यांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या ठिकाणी मुक्काम करून विशेष लक्ष घालून आढावा घेतला. या सर्व प्रकारामुळे बचावकार्याला वेग आला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, इर्शाळवाडीत जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी काम करणारी यंत्रणा मेहनत घेत आहे. त्या ठिकाणी अडकलेल्या आणि वाचलेल्या सर्व लोकांना आम्ही सुविधा देत आहोत. त्यासाठी कंटेनर मागविण्यात आले आहेत. त्यांना कायमस्वरूपी सामावून घेईपर्यंत मदत केली जाईल, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 

Google search engine