पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक कामगार जखमी.
ठाणे (Thane) : जिल्ह्यातील उल्हासनगर शहाड परिसरात असलेल्या सेंच्युरी रेयॉन कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये जोरदार ब्लास्ट झाला आहे. या भीषण दुर्घटनेत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक कामगार जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर कंपनी परिसराला सील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कंपनीला बॅरीगेटिंग केली असून प्रसार माध्यमांना देखील कंपनीमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे या संदर्भाची खरी माहिती समोर आलेली नाही. मात्र, हा ब्लास्ट इतका भीषण होता की आजूबाजूच्या चार ते पाच परिसरातील घरांना हादरे बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, सेंच्युरी रेयॉन ही नामांकित कंपनी असून या कंपनीमध्ये जो स्फोट झाला तो कशामुळे झाला याची अजून स्पष्टता झालेली नाही. सध्या पोलिस प्रशासन घटनास्थळी असून या स्फोट प्रकरणाचा तपास केला जात आहे.