पाण्यातील मासे – मगरींचा घ्या थरारक अनुभव; भारतातील पहिलाच प्रयोग.
नागपूर (Nagpur) : आजवर जंगल सफारी पूर्वी हत्तीवर बसून आणि आता जीप्सीमधून केली जाते. पण जंगल सफारीचा नवा थरारक अनुभव तुम्हाला आता नागपुरातून घेता येणार आहे. नागपुरातील पेंच (Pench) व्याघ्र प्रकल्पामध्ये बोटीमधून जंगल सफारी करता येणार आहे. बोटीमधून जंगल सफारीचा हा भारतातील पहिलाच प्रकल्प असेल. “बोट जंगल सफारी’च्या माध्यमातून वन्यप्रेमी आणि पर्यटकांना नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन होईल. यामध्ये वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानगवे आणि इतर काही प्राणी पाहता येणार आहे.
पाण्यातील मासे आणि मगरींचा थरारक अनुभव पर्यटकांना आता घेईल. तर नदीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या हजारो पक्ष्यांचे निरीक्षणही आता करता येणार आहे. राज्यातील आणि देशातील ही पहिलीच जंगल सफारी असणार आहे. यामध्ये पर्यटकांना एकून २३ किलोमीटरचा प्रवास करता येईल. यासाठी जवळपास अडीच तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे, पेंच व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीची सुरुवात होणार असलेल्या भागामध्ये जवळपास वीस वाघांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वाघ प्रेमींसाठी ही बोट जंगल सफारी वेगळीच पर्वणी ठरणार आहे. या बोट जंगल सफारीसाठी वन विभागाने सध्या चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वन विभागाकडून यासंदर्भातील आढावा देखील घेण्यात येत आहे. तर आता लवकरच पर्यटकांना या जंगल सफारीचा आनंद घेता येईल.
अशी असणार आहे जंगल सफारी
पेंच व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिली बोट जंगल सफारी नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल. या बोट जंगल सफारीमुळे जंगलाची शांतता भंग होणार नाही. कोणत्याही प्रकारचे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण न होऊ देण्यासाठी खास “सोलर बोट’ वापरली जाणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम विभागात चोरबाहुली ते नागलवाडी रेंज दरम्यान बोटीतून ही जंगल सफारी करता येईल. अडीच तासात जवळपास 23 किमीपर्यंत या बोटीतून जंगलाची सफर करता येणार आहे. तर या जंगलसफारीचे तिकीट दर हे प्रत्येकी 1500 रुपये इतके असणार आहे.
दोन हायब्रीड बोटींची खरेदी
यासाठी एकूण सहा बोटी लागणार असून बोट खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीएफ प्रभूनाथ शक्ल यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2 कोटी 90 लाख मंजूर झाले आहे.2 सोलर बोटी खरेदी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला दोन चार्जिंग स्टेशन राहाणार आहे. एका बोटीत एका वेळी 24 प्रवासी व तीन क्रु मेंबर असे 27 जण जाऊ शकतील. स्पीड ताशी 15 किमी राहिल.