आरक्षण नाही तोपर्यंत घराची पायरी चढणार नाही. – जरांगेंचा निर्धार

7
Manoj Jarange
Manoj Jarange

एकत्र आल्याने सरकार झुकले, महिनाभर गावागावात जागर करा.

जालना ( Jalna) : मराठा समाजाने (Maratha Samaj) एका महिन्याचा वेळ दिला आहे. राज्यभरात अहिंसक आंदोलन करा. समितीचा अहवाल कसाही आला तरी 31 व्या दिवशी मराठा समाजातील सर्वांना जात प्रमाणपत्र द्यायचे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जात बदनाम होऊ नये, म्हणून दोन पावले मागे हटत आहे. मी आमरण उपोषण सोडण्यास तयार आहे. पण जागा सोडणार नाही. महिन्याभरात सरकारने आरक्षण दिले नाही तर सरकार तोंडावर पडेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाची सर्वात मोठी सभा 12 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण देण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.

नेमके जरांगेंचे वक्तव्य काय?

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर एका दिवसात काढला तर तो न्यायालयात टिकणार नाही. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल. आम्ही आरक्षण देतो, एक महिना द्या, असे सरकारचे म्हणणे आहे. टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. सरकारला वेळ दिला तरी माझे आंदोलन थांबणार नाही. मी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला. आतपर्यंत आपण 40 वर्ष दिली आता एक महिना देऊ या. यानंतर टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

एकत्र आल्यामुळे सरकार झुकले

मनोज जरांगे म्हणाले की,आपण एकत्र आल्यामुळे सरकार आपल्यासमोर झुकले. प्रथमच सर्व पक्षांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणसंदर्भात ठराव करण्यात आला. त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या प्रश्नावर प्रथमच सर्व पक्ष एकत्र आले. मराठा आरक्षणामागे सरकार प्रथमच उभे राहिले आहे. ज्यांनी महिलांवर लाठीचार्ज केले, ते सर्व निलंबित होणार आहे. सरकारच्या या विषयावर दोन बैठका झाल्या आहेत.

मला माझ्या समाजाचे वाटोळे करायचे नाही. आम्हाला एक-दोन वर्षांचे नाही तर कायमस्वरुपी आरक्षण हवे आहे. एका महिन्याची मुदत दिली तर आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असेल. आरक्षणाची लढाई लहान नाही. पण ती मराठवाड्याने अंतिम टप्प्यात आणली. एका दिवसात जीआर काढला तर त्याला आव्हान देता येऊ शकते.

तोपर्यंत घराची पायरी देखील चढणार नाही

महिनाभर लेकरांचं तोंड पाहणार नाही, ज्या दिवशी जातप्रमाणपत्र हातात मिळेल त्यादिवशी आमरण उपोषण सोडेन. पण ही जबाबदारी तुमच्या जीवावर पार पाडतोय. तुम्ही स्वयंसेवक बना. सर्वांना शिस्त लावा. महिनाभर गावागावांत साखळी उपोषण चालवायचं आहे. दिल्लीचे शेतकरी आठ महिने बसले होते. हटले नाहीत पठ्ठे, मग तुम्हाला एक महिना जमणार नाहीत का?, असंही ते म्हणाले.

जरांगे पाटलांच्या या आहेत 5 मागण्या

1) अहवाल कसाही येवो आरक्षण द्यावे लागेल.
2) महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल तेवढे मागे घ्या.
3) लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करा.
4) उपोषण सोडायला, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण मंत्रिमंडळ आणि छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे आले पाहिजे.
5) सरकारच्यावतीने हे सर्व लिहून द्यावे.

Google search engine