पावसाळ्यात खाता- पिताना काय काळजी घ्याल?

63

पावसाळ्यात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. अर्ध्या रुग्णांना पोटाच्या विकारांनी ग्रासले आहे, ज्याचा संबंध अनेकदा दूषित पाण्यामुळे होतो. तर उर्वरित रुग्णांना सर्दी-ताप-खोकल्याचा फटका बसला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हेच चित्र पाहायला मिळते. पण विशेष काळजी घेतल्यास हे टाळता येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया पावसाळ्यात काय काळजी घ्यावे…

१) पावसाळ्यात पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, पोटाचे विकार असे आजार होऊ शकतात. त्यामुळेच पावसाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

२) पाणी : पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे. पावसाळ्यातील नवे पाणी बाधते. लोकांना सर्दी-पडसे याचा त्रास होत राहतो. ते टाळण्यासाठी म्हणून पाण्यात (पिंपात) सुंठेचा एक तुकडा घालावा, तो दर तीन-चार दिवसांनी बदलावा.

३) अन्न : पावसाळ्यात पचायला हलका आहार व प्रमाणशीर असाच आहार असावा. अधिक प्रमाणात घेतलेला आहार जो पचायला कितीही हलका असला तरी अयोग्यच! पचायला हलका आहार म्हणजे अग्निसंस्कार केलेला आहार. लाह्या, भाकरी, चपाती, दूधभात पिठले असा आहार, नुसत्या पावापेक्षा त्याचा टोस्ट बनवून खावा.

४) पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरात अग्नी कमी प्रमाणात असतो, जो अन्नपचनासाठी आवश्यक असतो. त्यामुळे या ऋतूत पक्वान्ने टाळावीत. मात्र स्वयंपाकाचे पदार्थ तेल-तुपाने मसाल्याचे चमचमीत बनवलेत तरी चालेल. आपण स्वयंपाकात जे हिंग मिरी, आलं, लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर, पुदीना इ. वापरतो, ही सर्व द्रव्ये दीपन-पचन करणारी आहेत. थोडक्यात, म्हणजे अन्नपचनाला मदत करणारी आहेत. मोजकेच तेल, वात कमी करणारे आहे तर साजुक तूप, वात व पित्त दोन्ही कमी करणारं आहे. कारण पावसाळयात वात व पित्त दोन्ही वाढलेले असते म्हणून जमल्यास अन्नपदार्थ साजुक तुपात करावेत; वनस्पती तुपात नव्हे.

५) तेलातील विशिष्ट घटकामुळे पित्त वाढते आणि वर्षा ऋतू म्हणजे पित्तसंचयाचा ऋतू ! म्हणून तेलात तळलेले पदार्थ या दिवसात खाऊ नयेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला गरम भजी, बटाटेवडे खावेसे वाटले तरी, प्रमाणात खाल्लेले बरे. अन्यथा असे पदार्थ जास्त खाणे म्हणजे आजारांना निमंत्रणच.

६) या ऋतूत दही कमी खावे. दह्यामुळे शरीरातील अग्नी मंदावतो, पण ताक याच्याविरुध्द गुणधर्माचे आहे. म्हणून या दिवसात ताक प्यावे. सुंठ, आलं व सैंधव मीठ घातलेले ताक व दह्याच्या वरचे पाणी नियमित प्यावे.

७) पालेभाज्यांमध्ये माठाची भाजी योग्य. शिवाय दुधी, दोडका, पडवळ, भेंडी, अशा वातशामक भाज्या अधिक प्रमाणात घ्याव्यात.

८) जुने धान्य पचावयास हलके असते. त्यामुळे या ऋतूत जुने गहू, जुने तांदूळ, जुनी धान्ये (मूग, मटकी, चवळी) वापरावीत. आवळा, लिंबू यांची सरबते उत्तम. ओवा, हळद, मिरी, सुंठ यांची पावडर करुन भाकरी, चपातीत वापरल्यास उत्तम.

९) मांसाहारी व्यक्तीने मांस खाण्यापेक्षा त्याचे सूप करुन प्यावे. यातही सुंठ, मिरी, पुदीना इ. चा सढळ हाताने वापर करावा.

आपल्या संस्कृतीत आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत “चातुर्मास” पाळला जातो. यामध्ये मांसाहार बंद असतो व उपवास जास्त असतात. उपवासाच्या पदार्थांत पिष्टमय पदार्थ जास्त असतात व ते पचण्यास सोपे असतात. उपवासात पोटास आराम मिळतो. म्हणून चातुर्मासाचे जरी धार्मिक निमित्त असले तरी, त्यामागे वैज्ञानिक कारणही असण्याची शक्यता आहे.

नेहमी लक्षात ठेवा, तुमचे पोषण आणि प्रतिकारशक्ती तुम्ही खात असलेल्या अन्नावर अवलंबून असते. म्हणून, तुम्ही काय खात आहात याची जाणीव ठेवली पाहिजे. महामारीच्या काळात किंवा पावसाळ्यात, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असताना, तुमच्या आहारावर आणि सुरक्षिततेवरही लक्ष केंद्रित करा!

Google search engine